निळकंठेश्वर मंदिर. पुणे | Nilkantheshwar Temple pune |
स्वराज्य रक्षक सेना स्वराज्य रक्षक सेना
17.1K subscribers
464 views
47

 Published On May 30, 2021

निळकंठेश्वरला जायला दोन मार्ग आहेतः
पहिला मार्ग - जर तुमची स्वतःची गाडी असेल तर पुण्याहून खडकवासला धरण - डोणजे फाटा - खानापुर मार्गे पानशेत गावी जायचं. पानशेतगावाजवळ दोन धरण आहेत आंबी नदीवरील पानशेत धरण (सध्याचे वीर तानाजी मालुसरे धरण) आणि मोसे नदीवरील वरसगाव धरण (सध्याचे वीर बाजी पासलकर धरण). पानशेत धरणाच्या भिंतीखालून एक रस्त्ता आपल्याला निळकंठेश्वरच्या पायथ्यापर्यंत घेउन जातो. पण पानशेत धरण ते निळकंठेश्वर पायथ्यापर्यंतचा हा रस्त्ता बराचसा खराब स्थितीतला आहे.

दुसरा मार्ग म्हणजे खानापुर आणि पानशेत दरम्यान रुळे नावाचे एक छोटेसे गाव आहे. गावात आल्यावर आपल्याला दिसते ते मुठा नदीचे सुंदर पात्र. नदीच्या पलीकडच्या तीरावर जांभळी नावाचे गाव आणि गावाच्या पाठीमागे असलेल्या उंच डोंगरावर वसले आहे "निळकंठेश्वर". नदी पार करण्यासाठी होड्या तयार असतात. जांभळी गावापासून निळकंठेश्वर पायथ्यापर्यंत जाण्यासाठी तुमची ४ किमी चालण्याची तयारी पाहिजे. आमच्यापैकी ४ किमी चालण्याची कुणाचीच तयारी नसल्यामुळे निळकंठेश्वर बद्दल पुरेशी माहिती गावकऱ्यांकडून मिळवून आम्ही पहिल्या मार्गाने जायचे ठरविले. पण जसे आम्ही पानशेत धरण पार केले तसा आम्हाला रस्त्याचा अंदाज येवू लागला. आम्ही गाडीत बसून होडीची मजा घेत पायथ्यापर्यंत पोहचलो आणि इथुनच डोंगराच्या खडी चढणीला सुरुवात झाली.

समुद्रसपाटीपासून निळकंठेश्वर साधारण तीन-साडेतीन हजार फूट उंचीवर हा डोंगर आहे. हा चढ अत्यंत सोपा असेल असे प्रथमदर्शनी वाटले. परंतु प्रत्यक्ष जेंव्हा चढण चढायला सुरुवात केली तेंव्हा लवकरच तिच्या सोपेपणाविषयीचा भ्रम नाहिसा झाला. हसत खेळत ती चढण चढत जाणारी आम्ही लवकरच धापा टाकीत, विश्रांती घेत, कसेबसे स्वतःला सावरत वर चढू लागलो. ह्याचे कारण लहाणपणाचे हलके शरीर, चपळाई व डोंगर चढण्याची सवय ह्यांच्या जागी सुस्तपणा, आय टी कंपनीत एका जागी ८-८ तास संगणकावर काम करणे, गिर्यारोहणाचा अभाव हेच असले पाहिजे. पायथ्यापासून तासाभरात आम्ही माथ्यावर पोहोचलो. सभोवतालचा परिसर आणि थंड वाऱ्याची झुळुक यामुळे क्षणार्धात आमचा थकवा नाहीसा झाला. डाव्या बाजुला असलेले पानशेत व वरसगाव धरण, ती खोल दरी आणि क्षितीजापर्यंत पसरलेली शेते ह्यांचे दृष्य फारच मोहक दिसत होते.

माथ्यावर निळकंठेश्वराचे प्रशस्त मंदिर आहे, पण मुख्य आकर्षण आहे ते इथल्या पुतळ्यांचे देखावे! दोन रेखीव हत्तींच्या पुतळ्याच्या स्वागत कमानीतून आपण आत शिरताच एकापाठोपाठ एक असे असंख्य सुंदर पुतळे आपणांस दिसु लागतात. निळकंठेश्वराच्या मुख्य मंदिरापर्यंतची वाट आणि संपूर्ण परिसर या आणि अशा सुंदर पुतळयांनी भरला आहे. दशावतार, इंद्राचा दरबार, सत्यवान-सावित्री, अमृत मंथन, कृष्ण्लीला, बकासुर वध, अष्टविनायक, नवनाथ जन्मकथा, शिवाजी महाराज, विविध जाती धर्मातले देव देवता, ऋषी-मुनी आणि रामायण-महाभारतातल्या प्रसंगांनी संपुर्ण परिसर सजीव झाल्यासारखे वाटते. १५-२० एकराच्या या परिसरांत एक हजाराच्या आसपास पुतळे आहेत. संपुर्ण पुतळयांचे दर्शन घेत आपल्या नकळतच आपण निळकंठेश्वराच्या मुख्य मंदिरात पोहचतो. त्याच भारावलेल्या अवस्थेत आपण त्याचे दर्शन घेतो. वनसंरक्षक व शिवभक्त शंकरराव सर्जे ऊर्फ सर्जेमामा यांन हे शिवलिंग सापडले, त्यांनी तिथे सुंदर मंदिर बांधले व हा पुतळ्यांचा देखावा उभारला आहे. सर्जेमामा यांनी सदर देवराई खुप चांगल्या प्रकारे सांभाळली आहे. सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून सर्जेमामा यांनी येथे दारु व्यसनमुक्ती अभियान सुरू केले आहे. देवळात लावलेल्या कात्रणानुसार सर्जेमामांनी सुमारे ४ ते ५ लाख लोकांना दारुच्या व्यसनातून मुक्त केले आहे. खरोखर त्यांचे कार्य खुप थोर आहे.

आम्ही तेथे गेलो त्यादिवशी त्रिपुरारी पौर्णिमा असल्याने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. आम्हीही महाप्रसाद घेऊन तृप्त मनाने परतीच्या मार्गाकडे वळलो. आपल्या महाराष्ट्रात कितीतरी प्रसिद्ध व पवित्र तीर्थक्षेत्र आहेत. त्यातील काहींची ख्याती त्या त्या प्रदेषापुरतीच मर्यादित असली तरी त्याचे महत्त्व त्यामुळे जराही कमी होत नाही.

show more

Share/Embed